व्यक्तिमत्व विकासामध्ये तुम्ही संवाद कसा साधता यालाही फार महत्व असते. ज्याला संवादाचे विविध पैलू समजले, तो खऱ्या अर्थाने आनंदी व श्रीमंत होऊ शकतो. सध्याचा काळ हा नेटवर्किंगचा काळ असल्याचे सतत बोलले जाते. म्हणजे एकवेळ तुमच्याकडे पद नसेल, पैसा नसेल पण मित्र असले पाहिजेत, तुमच्या भरपूर ओळखी असल्या पाहिजेत. हे मित्रच तुमची खरी ताकद असते. यामध्ये संवादाला कमालीचे महत्व आहे. सुसंवाद असण्या-नसण्यावरच हे संबंध चांगल्या प्रकारे निर्माण होतात व टिकून राहतात. Develop your own personality through communication
संवाद साधता येणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे. संवादाची सुरुवात करण्यासाठी ऐकण्याची कला आत्मसात करणे ही पहिली पायरी आहे. त्यातूनच समस्यांचे समाधान होते. एकदा समोरच्या काय म्हणतोय ते शांतपणे ऐकायचे हे मनाशी ठरवले की पुढील अनेक गोष्टी फार सोप्या होत जातात. अनेकदा केवळ समोरच्याचे न ऐकल्याने गैरसमज होतात. कारण त्याला काय म्हणायचे आहे हे न ऐकताच जर आपण त्याविषयी मनात काही ग्रह पक्के केले तर त्यातून जादाचे गैरसमज होतात. त्यामुळे नेहमी समोरच्या व्यक्तीला त्याचे पूर्ण मत मांडू द्यावे. तसेच समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर तत्काळ प्रतिक्रिया व्यक्त करू नये. कारण असे केल्याने चुकीचा संदेश जाण्याचा धोका असतो. समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकल्यावर त्यावर शांतपणे विचार करावा. तत्काळ प्रतिक्रिया देण्याची गरज नसेल तर नंतर बोलतो असे सांगावे. यामुळे संवादाची प्रक्रिया उत्तमप्रकारे पूर्ण होते. जेथे स्वत:शी संवाद नाही तेथे आत्मपरीक्षण नाही व पर्यायाने प्रगती नाही. संवाद हे आपल्या जिवंतपणाचे, माणूसपणाचे लक्षण आहे. आपल्या मनातील भावना, विचार प्रकट करता येणे, योग्य पद्धतीने मांडता येणे गरजेचे आहे. त्यातूनच सुख बहरते व दु:ख हलके होते. संवाद ही सर्वाना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे हे कायम लक्षात ठेवावे आणि त्यानुसार आचरण करावे.