पूर्वी मनुष्य अन्न कच्चेच खात होता. आगीच्या शोधानंतर मनुष्य अन्न शिजवून खाऊ लागला व त्यातून तो अन्नातील उष्णांक व फॅट्स सहज बाहेर काढू शकला, मात्र उच्च तापमानाला अन्न शिजवल्याने काही धोकेही पुढे आले. एखादा पदार्थ मोठ्या प्रमाणात भाजल्यास किंवा ग्रिल केल्यास त्यात अॅक्रिलामाइड नावाचे रसायन तयार होते. त्याचा उपयोग कारखान्यांत पेपर, डाइज व प्लॅस्टिक तयार करण्यासाठी होतो. प्राण्यांवर केलेल्या विविध संशोधनांतून या रसायनामुळे कॅन्सर होऊ शकतो. कर्बोदकांचे अधिक प्रमाण असलेल्या बटाटे व इतर कंदमुळे, तृणधान्ये, कॉफी, केक आणि बिस्किटांमध्ये हा धोका अधिक असतो. Destinations of Science: Why cooking too much food is dangerous for the body
भाजताना या पदार्थांतील स्टार्च प्रथम गडद रंगाचे व्हायला सुरवात होते, ते नंतर गडद तपकीरी रंगाचे व नंतर जळाल्यासारखे दिसू लागते. प्रयोगशाळेत प्राण्यांवर केलेल्या संशोधनातून अॅक्रिलामाइडमुळे कॅन्सर होत असल्याचे निष्पन्न झाल्याने मनुष्याने त्यापासून सावध राहावे. विशेषतः प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये अॅक्रिलामाइडचे प्रमाण अधिक आढळते. आहारातील अक्रिलामाइडचे प्रमाण कमी होण्यासाठी पदार्थ फक्त सोनरी रंगाचे होईपर्यंतच भाजावेत. पदार्थ बनवताना तयार होणाऱ्या धुरामध्येही अक्रिलामाइडचे प्रमाण खूप जास्त असल्याने फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते. लाल मांस, चिकन किंवा मासे उच्च तापमानाला ओव्हन किंवा कोळशाच्या शेगडीवर भाजल्यास टाइप-२ चा मधुमेह होतो व तो पुरुष आणि महिलांत सारख्याच प्रमाणात आढळतो, असेही दिसून आले.
अनेक घरांत पदार्थ शिजवण्याच्या पारंपरिक पद्धतींबरोबरच मायक्रोवेव्ह ओव्हन, विजेवर चालणाऱ्या शेगड्या व टोस्टर आले. आश्चीर्य म्हणजे, संशोधकांच्या मते तुम्ही कोणता पदार्थ शिजवत आहात त्यानुसार मायक्रोवेव्ह हा सर्वांत सुरक्षित पर्याय आहे. मश्रूम मायक्रोवेव्हमध्ये शिजवणे सुरक्षित असून, या पद्धतीत अॅन्टिऑक्सिडंटचे प्रमाण खूप वाढते. भाज्या शिजवण्यापेक्षा त्या थोडे पाणी घालून वाफवणे अधिक योग्य. भाज्या मोठ्या आचेवर व अधिक काळासाठी शिजवल्यास अॅक्रेलामाइडचे प्रमाण वाढते. तेलात तळणे हा प्रकारही धोकादायक असून, उष्णतेमुळे तेलावर विविध रासायनिक अभिक्रिया होतात व ते शरीरासाठी घातक ठरते. एकंदरीतच, अन्न खूप जास्त शिजवणे किंवा कच्चेच खाणे घातकच आहे.