धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्याने आपल्यावर केलेला परिणाम म्हणजे ताणतणाव आणि थकवा. कोणते ना कोणते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपण सतत धावत असतो. कुटुंबीयांसाठी दूरच; आपण स्वत:लाही वेळ देईनासे झाले आहोत. या धावण्याचा वेग एवढा आहे, की आपण थकलो आहोत हेही आपल्याला कळत नाही. तंत्रज्ञान रोज बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे पडघम वाजू लागले आहेत. ताणतणाव हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असल्याचे सिद्ध झाले आहे. तणावातून चिंता जन्माला येते आणि ही चिंता आपल्याला नैराश्यात ढकलत असल्याचेही नवी संशोधने सांगतात. चिंता किंवा तणाव ही कोणा एकाची नव्हे, तर सर्वव्यापी समस्या झाली आहे. Brain Discovery and Enlightenment: It is essential for everyone to manage stress properly
आज बहुसंख्य लोक या समस्येने ग्रासले आहेत. भारताच्या वाणिज्य क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज ऑफ इंडिया (असोचॅम) या संस्थेने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, खासगी क्षेत्रातील सुमारे ४२.५ टक्के कर्मचारी नैराश्याने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. वर्तणूक आणि भावना या दोन निकषांवर हा अभ्यास करण्यात आला. ही समजलेली टक्केवारी झाली. पण, आपण नैराश्याने ग्रस्त आहोत हेच न समजलेल्यांची संख्या मोठी असावी असा अंदाज आहे. आपल्याला नैराश्य येत असल्याचे अनेकदा कळत नसल्यामुळे नैराश्य ही सुद्धा एक प्रकारची शांतपणाने येणारी साथ म्हणावी लागेल.
कार्य संस्कृतीत वेगाने होत असलेल्या बदलांमुळे भविष्यात तणाव आणखी वाढणार आहेत. त्याचे मुख्य किंवा मोठे कारण असेल कामाच्या जागी येणारी कृत्रिम बुद्धिमत्ता. ई अँड वाय, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स (फिक्की) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सव्र्हिस कंपनीज (नॅसकॉम) यांनी केलेल्या अभ्यासानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या फायद्यामुळे आगामी दोन वर्षांत, म्हणजे २०२२ पर्यंत ४६ टक्के रोजगार किंवा कामांचे आजचे स्वरूप पूर्ण बदलून जाईल. ताण वाढण्याचे ते मुख्य कारण असेल. या बदलत्या स्थितीबरोबर जुळवून घेऊ न शकणारे किंवा नवे कौशल्य आत्मसात करू न शकणाऱ्यांना त्याचा फटका बसेल, असे हा अभ्यास सांगतो. त्यामुळे येत्या काळात प्रत्येकाने ताणाचे व्यवस्थापन कसे करता येईल याचा विचार प्राधान्याने केलाच पाहिजे.