नाशिक : बाळासाहेब आणि उद्धव, दोघांच्याही हातात जोडे; पण उद्धव पाहा किती हिंदुत्वापासून दूर गेले!!, असे विसंगत चित्र आजच्या जोडे मारा आंदोलनातून समोर आले.
बाळासाहेबांनी देखील असेच जोडे मारा आंदोलन केले होते. ज्यावेळी भाजपचे नेते देखील भीतभीत किंवा विशिष्ट अंतर राखून सावरकरांचे नाव घ्यायचे, तेव्हा बाळासाहेबांचा सावरकरांच्या सन्मानासाठी पुढे आले होते. 2004 मध्ये बाळासाहेबांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचा कापडी पुतळा करून त्याला मुंबई महापालिकेसमोर जोडे मारले होते. अंदमानातल्या सेल्युलर जेल स्मारकातल्या स्वातंत्र्य ज्योतीवरून सावरकरांच्या काव्यपंक्ती मणिशंकर अय्यर यांनी काढून टाकून त्यांचा अपमान केला होता. या अपमानाचा बदला बाळासाहेबांनी मणिशंकरला जोडे मारून घेतला होता.
ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पोवाडा लिहिला, 1857 च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास लिहिला, इतिहासाची सहा सोनेरी पाने लिहिली, त्या सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी जोडे मारले. बाळासाहेबांनी केलेले जोडे मारा आंदोलन त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर गाजले होते. राष्ट्रीय पातळीवरच्या हिंदी – इंग्रजी माध्यमांनी त्याची मोठी दखल घेतली होती.
उद्धव हाती जोडा
आज उद्धव ठाकरेंच्या हातात देखील जोडा होता. तो त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला मारला. यावेळी त्यांच्या शेजारी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले, कोल्हापूरचे काँग्रेस खासदार शाहू महाराज, भाई जगताप वगैरे नेते होते. पण 2004 मध्ये हेच शरद पवार मणिशंकर अय्यर यांच्या शेजारी मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसत होते. उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभे असलेले काँग्रेस नेते सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचेही समर्थक आहेत. या सगळ्यांच्या बरोबर उभे राहून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी सरकारला जोडे मारले.
त्यासाठी त्यांना मालवणच्या राजकोटमधला शिव पुतळा कोसळण्याचे निमित्त मिळाले. हा शिव पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवीच आहे. तो उभारताना झालेला गलथानपणा किंवा भ्रष्टाचार यांचे समर्थन होऊच शकत नाही. शिव पुतळा कोसळल्या प्रकरणी सगळ्या दोषींना कठोरातली कठोर कायद्याची शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जोडे मारा आंदोलन केले, तर विरोध करण्याचेही कारण नाही. पण ते ज्या लोकांबरोबर उभे राहून जोडे मारत होते, ते लोक काय लायकीचे होते आणि आहेत, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
काँग्रेसवाल्यांनी पुतळे तोडले
ज्या काँग्रेसवाल्यांना शेजारी घेऊन उद्धव ठाकरे जोडे मारत होते, त्याच काँग्रेसवाल्यांच्या कर्नाटक आणि मध्य प्रदेश मधल्या सरकारांनी जेसीबी लावून शिवाजी महाराजांचे पुतळे तोडले होते. त्याचे व्हिडिओ सगळ्या माध्यमांमध्ये व्हायरल झालेत. ते तरी उद्धव ठाकरेंनी पाहायला हवे होते. ज्या शरद पवारांच्या शेजारी उद्धव ठाकरे हातात जोडे घेऊन उभे होते, ते शरद पवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या शेजारी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसत होते, हे देखील उद्धव ठाकरेंच्या लक्षात यायला हवे होते.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे अनुकरण जरूर केले, त्यांनी हातात जोडे घेऊन ते मारण्याचे आंदोलन केले, पण प्रत्यक्षात जोडे मारताना मात्र ते हिंदुत्वापासून कित्येक मैल लांब गेल्याचेच चित्र दिसून आले. उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभे असलेल्या कावेबाजांनी त्यांना हिंदुत्वापासून खूप दूर खेचून नेले!!
Balasaheb and Uddhav Thackeray differences between Shoes beating agitation
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : कोर्टात वारंवार गैरहजेरीमुळे राज ठाकरेंविरुद्ध अटक वॉरंट; 2008 मध्ये कार्यकर्त्यांकडून बसवर दगडफेकीचा खटला
- Bangladesh : बांगलादेशात आता विद्यार्थी राजकारणावर बंदी; नवे सरकार घटना बदलून 33% महिला आरक्षण संपवणार
- Lobin Hembram: चंपाई सोरेननंतर आता लोबिन हेम्ब्रम यांनी भाजपमध्ये केला प्रवेश!
- Shyam Rajak : ‘राजद’ सोडल्यानंतर आता श्याम रजक पुन्हा ‘जेडीयू’मध्ये जाणार!