विनय झोडगे
पालघर सेक्युलर लिंचिंग संदर्भातील मीडिया आणि सोशल मीडियातील चर्चा सोनिया गांधी आणि अर्णव गोस्वामी यांच्या भोवती फिरायला लागली आहे. ही चर्चा अविष्कार स्वातंत्र्यासंदर्भात महत्त्वाची असली तरी यातून नेमका मूळ मुद्दा कोठेतरी सुटतोय किंवा बाजूला पडतोय, तो म्हणजे प्रत्यक्ष हे लिंचिग घडविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या म्होरक्यांना पिंजऱ्यात का उभे केले जात नाहीए…??
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस महाआघाडीने “चोरलेल्या बहुमताचे” सरकार आहे. गृह मंत्रालय राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ते शिवसेना किंवा काँग्रेसच्या ताब्यात नाही. लोकसभेत ५ खासदार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची “राजकीय कार्यसंस्कृती” लक्षात घेता गृह खात्यामध्ये ते शिवसेना किंवा काँग्रेस नेत्यांना “लक्ष” घालू देण्याची शक्यता कमी आहे. किंबहुना नाहीच…!!
अशा स्थितीत पालघर सेक्युलर लिंचिंगबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार यांना थेट प्रश्न विचारले पाहिजेत. अर्थातच पुन्हा पवारांची “राजकीय कार्यसंस्कृती” पाहता ते या प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत. उलट ते प्रश्न आणि प्रश्न विचारणारेही manage करतील. गेल्या काही महिन्यांमधील मराठी मीडिया आणि वृत्तवाहिन्यांच्या behavioral pattern कडे बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाराष्ट्रात “चोरलेल्या बहुमताला” मराठी मीडिया आणि वृत्तवाहिन्यांनी पवारांच्या “राजकीय मुत्सद्देगिरीच्या” रूपात रंगविले आहे.
पालघर सेक्युलर लिंचिंग प्रकरणी अर्णव गोस्वामीने सोनिया गांधी, वाड्रा परिवारासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. ते बरोबरच आहेत. पण खरे बोलायचे झाले तर यात गदारोळ आणि आक्रस्ताळेपणा जादा वाढत चाललाय. आणि एकदा एखादा मुद्दा गदोरोळी आणि आक्रस्ताळी झाला की त्यातून सत्य बाहेर येतेच असे नाही. आणि आले तरी त्याचे “स्वरूप” शुद्ध सत्याचेच राहते असे नाही. बोचरी असली तरी ही वस्तुस्थिती आहे. अर्णव सध्या उपस्थित करत असलेले मुद्दे त्या अर्थाने गदारोळी आणि आक्रस्ताळे होत चालले आहेत. यापासून सावध राहण्याची गरज आहे.
वृत्तवाहिन्यांच्या डिबेटमध्ये भाजपचे नेते युक्तीवाद भारी करतात. त्यांना संत समाजाची साथही चांगली मिळते आहे… पण हे सर्वजण “टार्गेट” करताहेत उद्धव ठाकरे यांना. तसे करणे स्वाभाविकही आहे. कारण याच संत समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात त्यांचे जंगी स्वागत केले. पालघर सेक्युलर लिंचिंगची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची आहे देखील… पण ही घटना आणि त्यामागचे धागेदोरे उद्धव ठाकरे आणि सोनियांपुरतेच मर्यादित नाहीत. या प्रकरणाची खरी जबाबदारी गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांची आणि पक्षप्रमुख म्हणून शरद पवारांचीही आहे.
खरे आणि टोचणारे प्रश्न पवारांना आणि देशमुखांना विचारले गेले पाहिजेत. भाजपच्या नेत्यांना आणि संत समाजाला यातून निखळ सत्य बाहेर येऊन खऱ्या दोषींना खरी शिक्षा व्हावे असे वाटत असेल, तर “अर्णवी डिबेट” च्या बाहेर येऊन त्यांनी पवारांना आणि देशमुखांना घेरले पाहिजे… नुसते मोदींच्या करिष्म्यावर अवलंबून राहून आणि टीव्हीवरच्या डिबेटमध्ये जिंकून पवारांना हरवता येता येणार नाही, हे महाराष्ट्रातल्या भाजप धुरिणांना जेवढे लवकर कळेल तेवढे चांगले…!!
त्याही पेक्षा पुढे जाऊन महाराष्ट्राचे राजकारण “ठाकरे factor” पेक्षा पवार factor” नासवले आहे, हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कळायला पाहिजे… आणि वळायलाही पाहिजे, हे जास्त खरे… पालघरच्या सेक्युलर लिंचिंग प्रकरणातून भाजपच्या नेत्यांनी एवढे दोन धडे घेतले तरी सध्या पुरेसे आहे…!!