वास्तविक भावना आणि स्मृतींची जवळीक हा दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. मात्र या भावनांमध्ये सकारात्मक भावनांचा वाटा जास्त असायला हवा. विशेषत: लहान मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तर नक्कीच. अमिग्डाला हे मेंदूतील भावनांचं केंद्र आहे. पण भीती ही भावना त्याला चटकन कळते. विशेषत: विविध प्रकारच्या भीतींची सवय करून घेणं. आणि योग्य वेळेला भीतीच्या पूर्वानुभवांची सर्वशक्तिनिशी जाणीव करून देणं हेही याचंच काम. शिकत असताना मुलं अनेक अनुभवांना घाबरत असतात. मार देणाऱ्या शिक्षकांचा यात पहिला क्रमांक असतो. This feeling of fear is easily understood by the brain
मार खाताना ज्या दु:खद आणि अपमानित करणाऱ्या भावना सहन केलेल्या असतात त्या स्मरणात पक्क्या असतात. त्यामुळे ते शिक्षक बघितले की त्या भावना आठवतात. दुसरं म्हणजे, विविध प्रकारच्या शारीरिक आणि शाब्दिक शिक्षा या दु:खद भावनांशी जोडल्या गेल्यामुळे लक्षात राहतात. शिक्षा म्हणून एखादा गृहपाठ पुन्हा करायला सांगितला तर त्या गृहपाठातला मजकूर किती लक्षात राहतो हे बघायला पाहिजे. त्याऐवजी अशी शिक्षा झाली म्हणून राग, अपमान, धुसफूस, रडारड हे लक्षात राहतं. पण त्यातला अभ्यासाचा भाग मात्र लक्षात राहणं अवघड.
ज्या कोणामुळे आणि ज्या कशामुळे पूर्वी भीती वाटलेली होती, तो घटक समोर आला की मेंदूकडून सूचना मिळते-लांब राहा. पूर्वीच्या अनुभवांची आठवण करून दिली जाते. ज्या मुलांच्या शालेय जीवनात असे शिक्षक, अपमानित करणाऱ्या शिक्षा, कमी गुण, सततचं अपयश, पालकांची सततची बोलणी असं सगळंच असेल त्यांची शिक्षणाविषयी एकूण गोळाबेरीज दु:खी भावनांभोवती एकवटली जाते. आणि म्हणून फारच पक्केपणाने स्मरणात जाते. असे अनुभव येणं हे शालेय जीवनासाठी तर घातक असतंच. पण एकूण पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा! म्हणून मुलांनी चांगलं शिकावं अशी इच्छा असेल तर स्मृतींभोवती भावनांची गुंफण हवी. पण त्या सुखद, उत्साहित करणाऱ्या भावना असायला हव्यात.