नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्षपदी पटेल नको असल्याच्या नुसत्याच पोकळ बाता; प्रत्यक्षात गुजरात्यांच्याच हातात दोन्ही राष्ट्रवादींच्या नाड्या!! हेच राजकीय वास्तव आज महाराष्ट्रासमोर आहे. फक्त ते राज ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवारांच्या गोटातल्या नेत्यांना पचत नाहीये. पण सगळे गडबड जळजळ आणि फडफड सुरू आहे. पण म्हणून राजकीय वास्तव बदलत नाही.
– प्रफुल्ल पटेल “व्हिलन”, पण…
अजित पवारांच्या अकाली “एक्झिट” नंतर ज्या प्रचंड वेगाने हालचाली करून सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री बनल्या, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हादरा बसला. शरद पवारांना स्वतःचे आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व अजित पवारांच्या राष्ट्रवादी वर लादता आले नाही. त्यामुळे शरद पवारांच्या गोटातल्या नेत्यांचा प्रचंड जळफळाट झाला. रोहित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राज ठाकरे, संजय राऊत आणि मनोज जरांगे या सगळ्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर दुगाण्या झाडल्या. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना व्हिलन ठरविले. सुनेत्रा पवारांच्या अडून भाजपच आता राष्ट्रवादीवर नियंत्रण ठेवतो आहे, असा आरोप केला. पण भाजप आपल्याला सत्तेच्या वाट्याला तुकडा मिळू देत नाही म्हणून या सगळ्यांचा खरा जळफळाट झाला.
– अजितदादांच्या आठवणींचा कढ
पण हा सगळा राजकीय नाट्यातला पहिलाच “डाव” होता. या पहिल्या डावातच शरद पवारांना धोबीपछाड बसला. त्यांना आपल्या मनासारखे काही करताच आले नाही. त्यामुळेच अजित पवारांच्या आठवणींचा कढ काढून त्यांना आणि त्यांच्या गोटातल्या नेत्यांना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची पुडी सोडावी लागली. पण ती पुडी सोडून सुद्धा पवारांची आणि त्यांच्या गोटातल्या नेत्यांची डाळ शिजली नाही म्हणून राज ठाकरे आणि संजय राऊत यांना देखील “मदतीला” घेण्यात आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष कोणी पटेल नको, अशी पुडी सोडली.
– राष्ट्रवादीच्या पदांचे वास्तव
पण म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला आज राष्ट्रीय अध्यक्ष नाही. अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त कार्याध्यक्ष आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि बाकीचे नेते मंत्री किंवा पदाधिकारी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्त्वाचा विलीनीकरणाचा निर्णय घेणे या सगळ्यांच्या सामूहिक नेतृत्वावर अवलंबून आहे. अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय अध्यक्ष नसल्यामुळे या पक्षाचे नेतृत्व आपोआप सामूहिक झाले आहे. त्यामुळेच त्यांच्या नाड्या अमित शाह आणि नितीन नवीन यांच्या हातात गेल्यात.
– शरद पवारांच्या भेटीला गौतम अदानी
पण त्यापलीकडे जाऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाड्या सुद्धा गुजराती नेत्यांच्या हातात आहेत, हे वास्तव कुणाला पचो की न पचो, वस्तुस्थिती बदलणार नाही. कारण कालच गौतम अदानी शरद पवारांना भेटून गेले. पण त्यांना कुणी अजून “व्हिलन” ठरविले नाही. आगामी भविष्यकाळात दोन्ही राष्ट्रवादींमध्ये कुठल्याही घडामोडी घडल्या आणि दोन्ही पक्ष विलीन झाले किंवा न झाले, तरी बऱ्याच राजकीय नियुक्त्या होणे अपेक्षित आहे. यामध्ये सुनेत्रा पवारांची राज्यसभा जागा रिकामी झाली आहे. त्यांच्या जागी पार्थ पवारची वर्णी लावायची आहे. शरद पवार एप्रिल महिन्यातच राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या आमदारांना मंत्रिपदाचा तुकडा मिळवायची घाई झाली आहे. पण ही सगळी पदे देणे किंवा न देणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातात नाही. ते फक्त आणि फक्त भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या हातात आहे, म्हणजेच मोदी, शाह आणि नितीन नवीन यांच्या हातात आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून सत्तेत घेणे किंवा त्यापैकी एकालाच सत्तेचा लाभ देणे हे मोदी, शाह आणि नितीन नवीन यांच्याच मर्जीवर अवलंबून आहे.
– सत्तेचा तुकडा गेल्यास राष्ट्रवादी विसर्जनाच्या दिशेने
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून शरद पवारांचे हात बळकट केल्याने भाजपच्या सत्तेत काहीही फरक पडत नाही. पण भाजपने राष्ट्रवादीला दिलेला सत्तेचा तुकडा काढून घेतला, तर मात्र दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होण्याऐवजी त्या विसर्जनाच्या मार्गाला लागण्याचा धोका आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कोणी पटेल नको, असे म्हणणे किंवा सोशल मीडिया पोस्टवर लिहिणे सोपे आहे, पण राष्ट्रवादीचे खरे राजकीय भवितव्य घडवणे किंवा राष्ट्रवादी नेस्तनाबूत करणे, हे फक्त शरद पवारांच्या हातात नाही, तर ते दोन गुजराती नेत्यांच्या हातात आहे!! त्यामुळे कोणी कितीही फडफड, जळजळ, धडपड केली, तरी काही फरक पडणार नाही. दोन गुजराती सत्तेवरची मांड ढिल्ली पडू देणार नाहीत.
Both NCPs are in net of Gujarati leaders
महत्वाच्या बातम्या
- दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची गरजच काय??, “हा” पर्याय उपलब्ध असताना!!
- Gautam Adani : अदानींनी यूएस-कोर्टाची नोटीस 15 महिन्यांनंतर स्वीकारली; फसवणुकीच्या प्रकरणात 90 दिवसांत उत्तर द्यावे लागेल
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले??, देवेंद्र फडणवीसांनी उलगडले तपशील!!
- केंद्रीय अर्थसंकल्पातून विकासित भारताकडे दमदार पाऊल, महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती