विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदवण्यासाठी चौकशी आयोगाने शरद पवार यांना समन्स बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आदळ आपट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायला सुरवात केली आहे.
कोरेगाव भीमा येथील दंगल सुनियोजित होती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, अशी मखलाशी करत पक्षाचे प्रवक्ते नबाब मलिक पवारांच्य़ा समर्थनासाठी उतरले आहेत. शरद पवार यांनी लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून म्हणणे मांडले आहे. शिवाय चौकशी आयोगाने पवारांकडे वेळ मागितली होती, असा दावाही त्यांनी केला. येत्या ४ एप्रिलला साक्ष नोंदविण्य़ाचे समन्स चौकशी आय़ोगाने शरद पवारांना बजावले आहे. यात पवारांनी आयोगाकडे वेळ मागण्याचा प्रश्न कोठून आला, याचे उत्तर देणे मलिकांनी टाळले.
उलट देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी दुगाण्या झोडल्या आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले होते परंतु त्यांनी चौकशीस आयोगाला सहकार्य केले नाही. लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून तसे कळवलेही नाही असा आरोप मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
चौकशी आयोगाकडून जे काही सत्य समोर येईल ते जनतेला कळेलच अशी मखलाशीही त्यांनी केली. संसदेचे अधिवेशन असल्याने शरद पवार हे दिनांक ४ एप्रिल रोजी चौकशी आयोगासमोर जाणार आहेत. राज्य चौकशी आयोगाची मुदत ही ८ तारखेला संपणार असली तरी इतर आयोगाप्रमाणे त्यालाही सरकारकडून मुदतवाढ दिली जाईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.