सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) संसदेने मंजूर केला असून त्याची वेळेत अंमलबजावणी केली जाईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ठणकावून सांगितले. Will implement the citizenship law J.P. Nadda nodded
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) संसदेने मंजूर केला असून त्याची वेळेत अंमलबजावणी केली जाईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ठणकावून सांगितले.
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर नड्डा म्हणाले की, हा कायदा केंद्राचा आहे.
सत्तेवर आल्यास आम्ही या कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही असे काँग्रेस म्हणत आहे त्याचे कारण त्याबाबत ते अज्ञानी आहेत अथवा त्यांना राज्यातील जनतेची फसवणूक करावयाची आहे. आपल्याला काँग्रेसच्या विचारांबाबत कोणतेही भाष्य करावयाचे नाही, परंतु त्यांची भूमिका केवळ समस्या निर्माण करणारीच नव्हे तर राज्यासाठी धोकादायक आहे. आसामची ओळख आणि संस्कृती यांचे संरक्षण करण्यास भाजप बांधील आहे
घुसखोरीच्या प्रश्नावर नड्डा म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सीमांची सुरक्षा करण्यास पक्ष बांधील आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात आत्मनिर्भर आसामसाठी दहा आश्वासने दिली आहेत. मिशन ब्रह्मपुत्राद्वारे आसामला पुरापासून वाचविण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.