विशेष प्रतिनिधी
पुणे : देशात आणि महाराष्ट्रात राजकीय घटना घडामोडींना उधाण आले असताना ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आणीबाणी आणि इंदिराजींची आठवण सांगून नेमका कोणाला राजकीय इशारा दिलाय, याची चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.sharad pawar pinches congress over emergency
शरद पवार म्हणाले, “आणीबाणीच्या काळात देशातील लोकशाहीच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या हजारो लोकांना अटक करण्यात आली. यामुळे एक अजब स्थिती देशासमोर उभी राहिली. देशातील जनेच्या मनात लोकशाहीबाबत श्रद्धा आहे.
त्यामुळे आणीबाणीनंतर लोकांना संधी मिळाली तर त्यांनी लोकशाहीविरोधात वागणारी कोणतीही शक्ती असो त्यांना धडा शिकवला. इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं. कारण लोकशाहीविरोधात छेडछाडी करण्याची त्यांची तयारी नव्हती.”
हे विधान करून पवारांनी नेमके कोणाला डिवचले आहे… दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन सुरू आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचले आहे की महाराष्ट्रात काँग्रेसने आक्रमक होऊन उपमुख्यमंत्रीपद मागितले म्हणून त्यांनी काँग्रेसला डिवचणारा आणीबाणीचा विषय काढला आहे, या विषयी राज्यात चर्चा सुरू झाली आहे. त्यातही पवारांनी जयप्रकाश नारायण यांचे नाव घेऊन काँग्रेसच्या दुखत्या नसेवरच हात ठेवल्याचे मानण्यात येते आहे.