विनायक ढेरे
नाशिक – …हे तर नुसते “फिल” देणे – घेणे पुन्हा सुरू झालेले दिसते. तिकडे दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्रातल्या “स्थानिक प्रश्नां”वर पत्रकार परिषद घेतात किंवा गृहमंत्री बदलण्याचा चर्चा करतात. इकडे दिल्लीतून मुंबईत आणि मुंबईतून नाशकात येऊन खासदार संजय राऊत पवारांना यूपीए चेअरमन करण्याच्या बाता पुन्हा करतात… यालाच म्हणतात… नुसते “फिल” देणे – घेणे. Sharad Pawar for UPA chairman, a good choice; suggests sanjay raut in nashik
पवारांना अधून – मधून आपण “राष्ट्रीय राजकारण” करायला पाहिजे, याची उबळ येते. मग ते राऊतांकरवी बोलतात… असा समज त्यांच्या समर्थकांनी महाराष्ट्रात पसरवून दिला आहे. त्यानुसारच राऊतांनी नाशिकमध्ये येऊन पवारांनी यूपीएचे नेतृत्व करण्याची राजकीय पुडी सोडून दिली आहे.
वास्तविक पाहता मागे एक दिवस शरद पवार यूपीएचे चेअरमन होणार ही पुडी सोडून झाली आहे. त्यावेळी दिवसभर त्या पुडीची चर्चा झाली आणि त्यातली “राजकीय धूळ” आपल्याच डोळ्यात गेली हे पाहून पवार सायंकाळी त्याचे खापर पत्रकारांवर फोडून मोकळे होऊन पुढे गेले.
पवारांनी बारामतीत सचिन वाझे या न दिलेल्या “स्थानिक प्रश्ना”चे उत्तर दिल्लीत जाऊन दिले. त्यानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्री बदलाची चर्चाही दिल्लीत जाऊन केली. यातून त्यांनी म्हणे आपण पंतप्रधान झाल्याचा “फिल” घेतला… त्याचे मिम बराच वेळ सोशल मीडियातून फिरत आहे… नेमके तसेच राऊतांच्या आजच्या नाशकातल्या वक्तव्याचे झाले आहे… दिल्ली – मुंबई सोडून नाशिकमध्ये येऊन त्यांनी पवारांनी यूपीएचे नेतृत्व करण्याचे वक्तव्य केले आहे.
आपला पक्ष म्हणजे शिवसेना ज्या आघाडीचा घटक पक्षही नाही, त्या यूपीएचे पवारांना चेअरमन करण्याची इच्छा व्यक्त करून राऊत मोकळे झाले. याची राजकीय धूळ आता पुन्हा उडण्याची त्यांची अपेक्षा आहे. पवार दिल्लीत महाराष्ट्राच्या प्रश्नांची चर्चा करून पंतप्रधान झाल्याचा फिल घेतात… तर राऊत हे नाशकात येऊन पवारांना यूपीए चेअरमन केल्याचा फिल देतात…पण हे त्यांचे नुसते एकमेकांना “फिल देणे – घेणे”च ठरतेय.