विशेष प्रतिनिधी
रायपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या इंडिया लेजेंड्स या संघानं तिलकरत्न दिलशान याच्या श्रीलंका लेजेंड्स या संघाचा Road Safety Series Finale मध्ये 14 धावांनी पराभव केला. Road Safety Series च्या पहिल्याच पर्वात रायपूरमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी मैदान गाजवलं.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या अंतिम फेरीत आज इंडिया लिजेंड्स संघाकडून युवराज सिंग आणि युसूफ पठाण यांनी तुफानी फटकेबाजी करून श्रीलंकन लिजेंड्स गोलंदाजांची धुलाई केली. आघाडीचे तीन फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाल्यानंतर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला युवराज सिंग आणि युसूफ पठाणने जबरदस्त फलंदाजी करून इंडिया लिजेंड्सला सुस्थितीत नेले. युवी आणि युसूफ पठाणच्या अर्धशतकांच्या जोरावर
इंडिया लिजेंड्स संघाने २० षटकांत ४ बाद १८१ धावा कुटत श्रीलंका लिजेंड्स संघासमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते.
🏆 We have our first champions of the @Unacademy Road Safety World Series, an intense final sees the #IndiaLegends come out on top after a close contest against the indomitable #SriLankaLegends. pic.twitter.com/96Fo51pXcA
— Road Safety World Series (@RSWorldSeries) March 21, 2021
इंडिया लिजेंड्स दिलेल्या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका लिजेंड्सने चांगली सुरुवात केली. श्रीलंकेच्या सनथ जयसुर्या आणि कर्णधार तिलकरत्न दिलशानने चांगली सुरुवात केली. मात्र इंडिया लिजेंड्सचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने जयसूर्याला बाद केले. जयसूर्याने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. यानंतर दिलशान देखील बाद झाला. दिलशानने १८ चेंडूत २१ धावा केल्या. इरफान पठाणने देखील दोन बळी घेतल्या. त्यामुळे इंडिया लिजेंड्सचा विजयाचा मार्ग सोपा झाला. इंडिया लिजेंड्सने श्रीलंकेला १४ धावांनी पराभूत करत रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंका लिजेंड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीराकले. त्यानंतर इंडिया लिजेंड्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. वीरेंद्र सेहवाग १० धावा काढून हेराथची शिकार झाला. तर बद्रिनाथला अनुभवी जयसूर्याने परतीची वाट दाखवली. त्यानंतर कर्णधार सचिन तेंडुलकरने युवराज सिंगसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिनही ३० धावा काढून महरुफची शिकार झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ७८ अशी झाली.
आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यावर युवराज सिंग (६० धावा) आणि युसूफ पठाण (नाबाद ६२ धावा) यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनीही षटकार चौकारांची बरसात करत चौथ्या विकेटसाठी ४७ चेंडून ८५ धावा कुटल्या. या भागीदारीच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने २० षटकांत १८१ धवा फटकावण्यात यश मिळवले.