विशेष प्रतिनिधी
कोलकता : पश्चिम बंगाल विधानसभेचे रण आता तापायला सुरुवात होवू लागली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवरुन भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसवरुन राजकीय संघर्ष पेटला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (ता. ६) भाजपची पश्चिम बंगालमध्ये राज्यव्यापी परिवर्तन यात्रा सुरू होत आहे.BJP rath yatra will heat up the politics of West Bengal,
नदिया येथून नड्डा यांचा रोड शो सुरू होणार होऊन त्याचा समारोप माल्दा येथे होणार आहे. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील भाजपची रथयात्रा पाच टप्प्यात आणि राज्यातील २९४ विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. प्रत्येक यात्रेत नव्याने रथ सामील होणार आहे. प्रत्येक यात्रेचा कालावधी हा २० ते २५ दिवसांचा आहे.
६ फेब्रुवारीला नड्डा यात्रेचे उदघाटन करतील. ११ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुचबिहार येथील एका रथात सामील होतील. महिनाभर चालणाऱ्या रथयात्रेत भाजपचे सर्व आघाडीचे नेते सामील होणार आहेत.
रथयात्रेवरुन बंगालचे राजकारण तापले असून भाजपकडून रथयात्रेची तयारी केली जात असताना तृणमूलकडून परवानगी दिली जात नसल्याचे चित्र आहे. याबाबत भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय म्हणाले, की न्यायालयाने रथयात्रेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन ही यात्रा रोखू शकणार नाही. विरोधी पक्ष म्हणून जनतेत जाण्याचा आम्हाला अधिकार आहे.