पंकजा, खडसे, बावनकुळेंना भाजपचा धक्का; तीन नव्या ओबीसी चेहरयांना संधी व मोहिते पाटलांचेही पुनर्वसन!


  • विधानसभेला पराभूत झाल्यानंतर पक्षाबद्दल उलटसुलट मेसेज देणारया पंकजा मुंडे या पक्षादेश मानून गप्प बसणार? का शिवसेनेकडे झुकणार? का ‘एकला चलो रे’ चा मार्ग स्वीकारणार?
  • एकनाथ खडसे खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर जातील?

विशेष प्रतिनिधी

मुंबई , नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना जबरदस्त धक्का दिला असून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्याचे धाडस दाखविले आहे. त्याऐवजी गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, डाॅ. अजित गोपछडे हे तीन नवे ओबीसी चेहरे पुढे आणले आहेत. तसेच लोकसभेला भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही भाजपने विधानपरिषद दिली आहे. त्यामुळे पंकजा व खडसे काय करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगलेली आहे.

विधानपरिषदेच्या चार जागांची घोषणा दिल्लीतून झाली. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना विधानपरिषद द्यायची नाही, असा दिल्लीचा दंडक पहिल्यापासूनच आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, बावनकुळे यांना नक्कीच उमेदवारी दिली जाईल, असे वाटत होते. स्वतः पंकजा यांनी अर्ज भरण्याची तयारीदेखील सुरू केली होती. त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेले अर्ज चांगलेच व्हायरल झाले होते. “भाजपला चूक उमगेल आणि आपल्याला विधानपरिषद मिळेल”, असे स्वतः खडसे नेहमी बोलवून दाखवत होते. दुसरीकडे बावनकुळे यांच्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत होते. पण दिल्ली नेतृत्वाने या तिघांच्या नावांवर काट मारली आणि ओबीसींचे नवे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. याशिवाय या निर्णयाने फडणवीसांच्या दिल्ली दरबारी असलेल्या वजनावरही शिक्कामोर्तब झाले आहे.


दिल्लीचा संदेश

  • विधानसभा हारलेल्यांना विधानपरिषद न देण्याच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी. अपवाद गोपीचंद पडळकरांचा. कारण त्यांच्या बारामतीमधून ऐनवेळी बळी दिला गेला होता…
  • तुमच्या प्रचाराला मोदी, शहा येऊन गेले आणि तरीही तुमचा पराभव होतो. त्यानंतर तुम्ही पक्षाविरुद्ध विधाने करता, प्रदेश नेतृत्वाला अडचणीत आणता… हे चालणार नाही, असा संदेश पंकजांना आहे. शिवाय काही दिवसांपूर्वीच डाॅ. भागवत कराड यांच्या रूपाने वंजारी समाजाला राज्यसभेत प्रतिनिधित्व दिले आहे.
  • खडसेंनाही आपला मुक्ताईनगर मतदारसंघ टिकविता आला नव्हता. शिवाय ते सतत पक्षाविरोधात विधाने करतात, राष्ट्रवादीबरोबर जाण्याची सतत धमकी देत असतात… पक्षाला हे मान्य नाही.
  • बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्या नावावर विधानसभेला मारलेल फुली अजूनही कायमच आहे.
  • फडणवीस हेच महाराष्ट्र भाजपचे नेते आहेत, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब. अपवाद फक्त बावनकुळेंसाठी केलेल्या प्रयत्नांचा. बावनकुळेंना फडणवीसदेखील वाचवू शकले नाहीत.

पडळकर हे धनगर समाजातील धडाडीची तोफ मानली जाते. त्यांना विधानसभेला बारामतीमधून अजित पवारांविरुद्ध ऐनवेळी उभे केले होते. सडकून पराभव झाला होता. त्यानंतर त्यांचे नाव राज्यसभेसाठीही सुचविले होते. पण ऐनवेळी औरंगाबादचे, वंजारी समाजाचे डाॅ. भागवत कराड यांना पक्षाने निवडले होते. त्याचवेळी पंकजा यांच्याबद्दल पाल चुकचुकली होती. प्रवीण दटके हे नागपूरचे माजी महापौर व तेजतर्रार युवा नेते आहेत. त्यांना फडणवीस व नितीन गडकरी या दोघांचाही आशीर्वाद असल्याचे मानले जाते.

डाॅ. गोपछडे हे नांदेडचे आहेत. ते भाजपच्या वैदयकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. चौथे उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील हे लोकसभेला भाजपमध्ये आले होते. मोहिते पाटील यांच्यामुळे माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा मतदारसंघ भाजपला जिंकता आला होता. यानिमित्ताने मोहिते पाटील घराण्याला ताकत देण्याचे काम भाजपने केले आहे. रणजितसिंहांना संधी मिळाल्यामुळे हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक या अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचा चांगलाच हिरमोड होईल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात