वृत्तसंस्था
कोलकाता : तृणमूल काँग्रेस व भाजपने पश्चिम बंगालची ओळख व राज्यातील धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे उध्वस्त केली, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि माकपचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी केला. सिंगूर आणि नंदीग्राममध्ये ‘स्मशानभूमीतील शांतता’ अजूनही कायम असल्याचा आरोप करत भट्टाचार्य म्हणाले, की सध्याच्या व्यवस्थेमुळे पश्चिम बंगाल कृषीमध्ये पिछाडीवर पडले असून गेल्या १० वर्षांमध्ये राज्यात कोणताही नवीन उद्योग आलेला नाही. TMC, BJP destroy West Bengals identity
बंगालच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी गमावल्या. राज्यातील प्रतिकूल परिस्थितीमुळे कुशल व्यक्तींनी इतर राज्यात स्थलांतर केले, भ्रष्टाचार, पिळवणूक आणि सिंडिकेट राजमुळे पश्चिम बंगालच्या जनतेचे जगणे असह्य केले आहे. समाजविघातक कारवायांमुळे राज्यातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. एकेकाळी पश्चिम बंगालचा अभिमान असणाऱ्या धार्मिक सौहार्दतेलाही तडा गेला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील भूसंपादनविरोधी आंदोलन झाले. त्यामुळे, शक्तीशाली डाव्या आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा पाया रचला गेला.
या कुटील डावपेचाचे प्रमुख सूत्रधार आता दोन गटात विभागले गेले असून ते आता एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. असेही भट्टाचार्य यांनी नमूद केले.