महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक युतीची सत्ता असलेले सरकार असून त्यात अंतर्विरोध आहेत. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांंनी केला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक युतीची सत्ता असलेले सरकार असून त्यात अंतर्विरोध आहेत. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांंनी केला.
मंगळवारी पावसाळी अधिवेशनासंदर्भात बैठक होती. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकार अस्थिर असल्याचा पुनरुच्चार झाला. अधिवेशनाच्या तोंडावर फडणवीसांनी सरकारविरोधातील आपली टीका तीव्र केल्याचे पाहायला मिळाले.
फडणवीस म्हणाले, आम्ही सरकारकडे लक्षच देत नाही. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक अंतर्विरोध आहेत. हे सरकार अंतर्विरोधांनी भरलेले आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालायचे तितके दिवस चालेल. एक दिवस जाईल. त्यामुळे ते काय म्हणतात, हे काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही. ही अनैसर्गिक युती आहे. अशी अनैसर्गिक युती देशाच्या राजकारणात फारशी कधी टिकली नाही.
ई-पासवर बोलताना ते म्हणाले, केंद्राचे निर्णय राज्य सरकार लागू करत नाही. ई-पासच्या मुद्द्यावर राज्य सरकारची विसंगती स्पष्ट झाली आहे. एसटीला ई-पास नाही, मग खासगी वाहनांना का आहे.
सुशांतसिंह प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, लवकरच सीबीआय चौकशी पूर्ण करेल आणि सत्य समोर येईल.